* वकिलाने गिळले विष, सुसाइड नोटमध्ये लिहिले : माझ्या मुलांना तिच्याकडे देऊ नका’
* प्रेमप्रकरणात पत्नी प्रियकरासोबत फरार ; नवऱ्याने घेतला टोकाचा निर्णय
* रुग्णालयात जीव-मृत्यूशी झुंज - कुटुंबात हळहळ, समाजात खळबळ !
बरेली (उत्तर प्रदेश) / प्रतिनिधी :- पती-पत्नीच्या नात्यातील विश्वासघात आणि त्यातून उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब...अशी मन हेलावून टाकणारी घटना बरेली जिल्ह्यातील कँट पोलिस ठाणे क्षेत्रात घडली आहे. एका वकिलाच्या पत्नीने दोन लहान मुले असूनही प्रियकरासोबत घर सोडले आणि या धक्क्याने पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तो जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) मध्ये मृत्यूसोबत झुंज देत आहे, तर त्याच्या खिशातून सापडलेल्या सुसाइड नोटमुळे या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
* जिने मला आणि माझ्या मुलांना धोका दिला, तिला मुलांजवळ जाऊ देऊ नका :- वकिलाने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तो म्हणतो की, मी आता जगू शकत नाही…जिने मला आणि माझ्या मुलांना धोका दिला, कृपया माझ्या मुलांना तिच्याकडे देऊ नका. ही नोट वाचताच कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. आजोबा-आजींचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. दोन निरागस मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्या एका चुकीने…अशी हळहळ संपूर्ण कुटुंब व्यक्त करीत आहे.
* आठ वर्षांचं लग्न, दोन मुलं आणि तरीही... विश्वासघात :- मिळालेल्या माहितीनुसार, सदर वकिलाचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन लहान मुले असूनही पत्नीचे काही महिन्यांपासून एका युवकासोबत प्रेमसंबंध सुरू होते. नातेवाईकांनी वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने ऐकले नाही. काही दिवसांपूर्वी ती अचानक घरातून गायब झाली. सुरुवातीला सर्वांना वाटले की, ती माहेरी गेली असेल. पण शोध घेतल्यानंतर समजले की, ती प्रियकरासोबत पळून गेली आहे. हे सत्य कळताच पती कोलमडून पडला. कुटुंबातील सदस्य सांगतात की, तो काही दिवस काही खात नव्हता, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते...
* कौटुंबिक तणावातून घेतला टोकाचा निर्णय :- डिप्रेशनमध्ये गेलेल्या वकिलाने घरी विष प्राशन केले. कुटुंबीयांना तो बेशुद्ध अवस्थेत दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. डॉंक्टरांनी सांगितले की, त्याची स्थिती अजूनही अतिशय गंभीर आहे. कँट पोलिस ठाण्याने प्रकरणाची नोंद केली असून, पत्नी आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. पतीची प्रकृती सुधारल्यानंतरच त्याचे अधिकृत स्टेटमेंट नोंदवले जाईल.
* दोन निष्पाप मुले आणि उद्ध्वस्त झालेले घर :- या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आजी-आजोबा मुलांच्या अवस्थेकडे पाहून सतत रडत आहेत. त्यांनी पोलिसांना विनंती केली आहे की, त्या दोघांना पकडा…आमच्या लेकरांचे भविष्य उद्ध्वस्त केले त्यांनी! प्रेमाचा शेवट जेव्हा विश्वासघातात होतो, तेव्हा सर्वात मोठी शिक्षा निरपराध मुलांना भोगावी लागते.


Social Plugin