* पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऐतिहासिक क्षण
* माजी खा. बळीराम जाधव यांच्या हस्ते जलपुरवठ्याचा शुभारंभ
* हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील आणि रमेश घोरक यांच्या प्रयत्नांना यश ; गावात आनंदाचा माहोल
वसई / प्रतिनिधी :- वालीव परिसरातील नागरिकांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला आनंदाचा क्षण अखेर साकार झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत सूर्या जलपुरवठा योजनेचे पाणी अखेर वालीवकरांच्या नळांपर्यंत पोहोचले आहे. रविवारी वालीव नाका येथील मनोहर नगरमध्ये झालेल्या समारंभात माजी खासदार बळीराम जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून जलपुरवठ्याचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी बविआचे वालीव अध्यक्ष जयप्रकाश पाटील, माजी सरपंच लक्ष्मण पाटील, हरेश्वर भगत, सुलोचना शिंदे, सदस्य अरुण पाटील, यशवंत पाटील, राजा मोहिते, जगदीश भोईर, महेश धनगर तसेच ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण होते. विशेषतः महिला वर्गाने पाणीटंचाईपासून मुक्ती मिळाल्याबद्दल आभार आणि समाधान व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांपासून वालीव परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाई भासत होती. मात्र, अमृत योजनेतून आता सूर्या धरणाचे पाणी थेट घरपोच उपलब्ध होणार असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, दरवर्षी पाण्यासाठी त्राहिमाम होत होता. आता सूर्याच्या पाण्यामुळे आमच्या गावाला नवजीवन मिळाले आहे.
या योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील आणि माजी सभापती रमेश घोरक यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच जगदीश भोईर आणि महेश धनगर यांनी योजनेचा सातत्याने पाठपुरावा करीत ही योजना प्रत्यक्षात उतरविण्यात मोलाची भूमिका बजावली.


Post a Comment
0 Comments