* भाजपातर्फे मुरुड तहसीलदार यांना निवेदन
मुरूड / राजीव नेवासेकर :- गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भातपीक भिजून, वाहून नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई द्यावी. याबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पावसाळी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुरूड तालुक्यांतील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून सदर शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगाम फुकट गेलेले आहेत, झालेल्या अतीवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले व आता पुढील हंगामाकरीता शेतात पाणी असल्यामुळे वाल व तत्सम पीके शेतकरी घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगाम फुकट गेले आहेत.
मुरुड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या भातपीकाचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने मुरुड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या भातपीक नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते शैलेश काते, ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे, सुधीर पाटील, विनोद भगत, अभिजित पानवलकर, रमेश दिवेकर, राजेश दिवेकर, भरत महादान, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इसरार पांगारकर, सुजित जमादार, धर्माजी हिरवे, प्रवीण भाटकर, धनेश गोगर, लक्ष्मण बुल्लू, जगदीश मांदाडकर, विजय तरे, हरेश आरकशी, उमेश माळी उपस्थित होते.
मुरुड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या भातपीक नुकसानी बाबत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक यांना आदेशित करण्यात आले असल्याचे तहसीलदार आदेश डफळ यांनी यावेळी सांगितले.


Social Plugin