* महिलेचा गळा आवळून खून
* 40 हजारांच्या वादातून हत्या
* काही तासांतच आरोपी जाळ्यात
रायगड / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यात एका महिलेचा उधारीच्या पैशांच्या वादातून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पनवेलजवळील कुंडेवहाळ येथे संगिता नामदेव म्हात्रे (वय 55) यांचा गळा आवळून खून केला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व काही तासांत आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
आरोपीचे नाव मोहंम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (वय 23) असे आहे. त्याने मृत महिला संगिता म्हात्रे यांना 40 हजार रुपये उसने दिले होते. परंतु, महिला पैसे परत देण्यास विलंब करीत असल्याने आरोपीने रागाच्या भरात त्यांचा गळा आवळून खून केला आणि त्यांच्या अंगावरील दागिने चोरून फरार झाला.
* पोलिसांचा शिताफीने उलगडा :- पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास पथकाने या गुन्ह्याचा काही तासांत पर्दाफाश केला. तपासादरम्यान महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने गायब असल्याचेही उघड झाले. महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत महिला पथकाने परिसरातील सुमारे 30 लोकांची चौकशी केली. या चौकशीत आरोपी अन्सारी याने संशयास्पद उत्तरे दिल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई वपोनि नितीन ठाकरे, सपोनि प्रज्ञा मुंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका झांझुने, उपनिरीक्षक प्रविण फडतरे, विनोद लभडे व महिला पोलिस पथक यांनी केली.
* पैशांच्या वादात जीव गेलेली महिला :- भावनिक तीव्रता, आर्थिक ताण आणि राग यामुळे एक निर्दोष जीव गेला आहे. उधारीच्या पैशांवरून होणारे ताणतणाव किती धोकादायक ठरू शकतात याचे हे उदाहरण आहे.
* नागरिकांना पोलिसांचे आवाहन :- उधारी, कर्ज देणे-घेणे यांच्याशी संबंधित वाद वाढण्यापूर्वी कायद्याचा मार्ग अवलंबावा, स्वतःहून वाद सोडविण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Social Plugin