* पारदर्शक पद्धतीने समाजजोडणीचे कार्य ; २०२३-२४ मध्ये ९६४ नोंदणी, १६७ विवाह यशस्वी
मुंबई / प्रतिनिधी :- बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळाच्या वतीने भव्य वधू-वर परिचय मेळावा मुंबईतील परळ-भोईवाडा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समितीचे कार्यसम्राट व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात सुमारे २०० विवाहोच्छुक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.
* उद्घाटन व कार्यक्रमाची सुरुवात :- महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. सरचिटणीस राजेश घाडगे यांनी ओजस्वी व प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करीत मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला.
ते म्हणाले की, २०१० मध्ये सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या समितीत आगमनानंतर समितीला वैभवशाली कालखंड लाभला. त्यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या १५ उपसमित्यांपैकी विवाह मंडळ महत्त्वाचे असून, यंदा ९६४ तरुण-तरुणींनी नोंदणी केली आणि १६७ विवाह यशस्वीरीत्या पार पडले. पारदर्शकतेच्या बळावर हे कार्य पुढेही सुरू राहील.
* विवाह मंडळाचे ध्येय - विचार, शिक्षण आणि साम्यता :- विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ (रामदास धो. गमरे) यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, हा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम नाही; तर दोन विचार, दोन मनं आणि दोन कुटुंबांचा पवित्र संगम आहे. जात-पात, हुंडा, दागिने यापेक्षा शिक्षण, विचार, समजूतदारपणा आणि साम्यता यांना आम्ही प्राधान्य देतो.
यावेळी उपसभापती विनोद मोरे व माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे यांनी विवाहोच्छुक युवक-युवती व पालकांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांमध्ये मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, अशोक कांबळे, चंद्रमणी तांबे, सचिव संदेश खैरे, सदानंद येलवे, तुळशीराम शिर्के, प्रमिलाताई मर्चंडे, अंजलीताई मोहिते, सायली साळवी यांचा समावेश होता.
* मेळावा यशस्वी करण्यासाठी योगदान :- मंगेश पवार गुरुजी, गौतम तांबे गुरुजी, प्रविण तांबे गुरुजी, रविराज शेळके, अशोक कदम, नरेश मोहिते, संजय मोहिते, राहूल कदम, मधुकर नरे, प्रदीप तांबे तसेच संपूर्ण व्यवस्थापन मंडळ व कार्यकर्ते यांनी मेळावा यशस्वीतेसाठी महत्त्वाचे योगदान दिले. शेवटी विवाह मंडळाचे सरचिटणीस गौतम जाधव यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.


Social Plugin