* दिवसाला 22 वरून थेट 78 विमानफेऱ्या
* उन्हाळी वेळापत्रक 29 मार्चपासून लागू
नवी मुंबई / प्रतिनिधी :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या विमानतळावरून देशातील तब्बल 30 नवीन शहरांसाठी उड्डाण सेवा सुरू करण्यात येणार असून, 29 मार्च 2026 पासून हे नवीन उन्हाळी वेळापत्रक लागू होणार आहे. यामुळे नवी मुंबई आता देशाच्या हवाई नकाशावर अधिक वेगाने झळकणार आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दिवसाला केवळ 22 असलेल्या विमानफेऱ्यांची संख्या आता थेट 78 वर पोहोचणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होईल. नवीन सेवांमुळे एप्रिलपर्यंत नवी मुंबई विमानतळावरून एकूण 46 देशांतर्गत शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. या शहरांमध्ये व्यापार, पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
सेवा सुरू होणारी प्रमुख शहरे :- राजकोट, हुबळी, जबलपूर, भावनगर, भोपाळ, तिरुवनंतपुरम, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), अयोध्या, बागडोगरा, बरेली, आग्रा, बेळगाव, दिऊ, दुर्गापूर, गोवा, गोरखपूर, हिंडन, विशाखापट्टणम, चंदीगड, डेहराडून, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, श्रीनगर, तिरुपती, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना आणि रायपूर.
29 मार्च ते 24 ऑक्टोबर 2026 हा कालावधी या विमानतळासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात आठवड्याला सुमारे 1,092 विमानफेऱ्या होण्याचा अंदाज आहे. नवी मुंबई विमानतळाच्या विस्तारामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.


Social Plugin