* दादर - भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी
* विशेष गाडीचा ‘रेग्युलर’ दर्जा ; तिकीट दरात 20-25 % घट
पाचोरा / प्रतिनिधी :- खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दादर ते भुसावळ दरम्यान धावणारी विशेष रेल्वे सेवा आता कायमस्वरूपी करण्यात आली असून ती पुढे 19047/48 दादर - भुसावळ एक्सप्रेस या क्रमांकाने नियमित धावणार आहे. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार आहे.
मुंबई आणि खान्देश दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. विशेष गाडीच्या स्वरूपात सुरू असलेली ही सेवा अनेकांसाठी जीवनवाहिनी ठरली होती. आता या गाडीला कायमस्वरूपी दर्जा मिळाल्यामुळे प्रवाशांना नियमित वेळापत्रकानुसार प्रवास करता येणार असून अनिश्चिततेचा प्रश्न संपणार आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिकीट दरात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. विशेष गाडी असल्यामुळे यापूर्वी जादा भाडे आकारले जात होते. मात्र आता नियमित एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच खान्देशच्या खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पश्चिम रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जनरल मॅनेजर आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्याही प्रयत्नांचे कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments