* महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईची मागणी
* मुस्कान सय्यद यांचे राज्यपालांना निवेदन
* महिलांना सोशल मीडियापासून सावध रहावे
* महिला आघाडी नेत्या सय्यद यांचे आवाहन
कर्जत-खालापूर / खलील सुर्वे :- महाराष्ट्रात अलीकडे उघडकीस आलेल्या काही गंभीर आणि समाजाला काळीमा फासणाऱ्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक महिला आघाडी कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्षा मुस्कान खालिद सय्यद यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुस्कान सय्यद यांनी काही प्रकरणांचा उल्लेख करीत, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. भोंदू बाबा अशोक खरात, अमरावती येथील नराधम अयान अहमद व नाशिक येथील टीसीएस (TCS) कंपनी प्रकरणात कायद्यानुसार कडक शिक्षा देण्याची मागणी त्यांनी राज्यपाल महोदय यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विशेष आवाहन करतांना सांगितले की, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारखी सोशल मीडिया खाती शक्यतो प्रायव्हेट ठेवावीत, वैयक्तिक फोटो व माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे अतिरिक्त सतर्कता बाळगावी
मुस्कान सय्यद यांनी तरुणींना विशेष संदेश देतांना सांगितले की, कोणत्याही नात्यात जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची खातरजमा करावी, वैयक्तिक किंवा खाजगी फोटो-व्हिडिओ शेअर करणे टाळावे, ऑनलाईन ओळखीबाबत अधिक दक्षता घ्यावी.
पोलिस प्रशासनाकडेही त्यांनी एक सामान्य नागरिक म्हणून मागणी करीत, अशा गंभीर गुन्ह्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली. सदर प्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक यांना देखील निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.


Post a Comment
0 Comments