* टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा
* बजरंगबली की जय’ च्या घोषात दुमदुमला परिसर
भिवंडी / नरेंद्र एच पाटील :- भिवंडी तालुक्यातील गोवेगाव येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात भव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. 'बजरंगबली की जय’च्या जयघोषाने गोवेगावचा आसमंत दुमदुमून गेला होता. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी आणि ग्रामस्थांनी फेर धरत भक्तीचा उत्सव साजरा केला. या भक्तीमय वातावरणामुळे गावात चैतन्याचे उधाण आले होते. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेली पालखी हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला.
या सोहळ्यासाठी पालखी विश्वस्त प्रवीण तुळशीराम पाटील (पोलीस पाटील), प्रमोद पाटील, हर्षदा लक्ष्मण पाटील, नेताराम म्हस्के तसेच ASI केंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह सरपंच, उपसरपंच, महिला मंडळ, हरिपाठ मंडळ आणि जय हनुमान तालीम संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोनगाव पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले. पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ मंडळाच्या समन्वयातून हा पालखी सोहळा अत्यंत सुरळीत आणि शांततेत पार पडला.
या उत्सवाबाबत बोलताना नितुराज पाटील यांनी सांगितले की, परंपरा जपली की गाव प्रगत होते आणि भक्ती एकत्र आली की समाज बलवान होतो. गोवेगावातील हा सोहळा केवळ धार्मिक नसून ग्रामएकतेचे प्रतीक आहे.
ग्रामस्थ मंडळ आणि तरुण पिढीने ज्या उत्साहाने आणि शिस्तीत ही परंपरा जपली आहे, त्याचे ठाणे-भिवंडी परिसरात कौतुक होत आहे. या सोहळ्याने धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला.


Post a Comment
0 Comments