* पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन ; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
वसई / प्रतिनिधी :- वसई महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना (शिंदे गट) वसई तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा उत्साहात पार पडला. या बैठकीला नवनिर्वाचित पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
निवडणुकीनंतर संघटनेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी पांडुरंग पाटील यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून आले. शिवसेनेचे कार्य हे जनतेशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत शाखास्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष भर देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक शाखेच्या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. संघटन मजबूत करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपर्क प्रमुखांच्या मार्गदर्शनामुळे संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका हेमलता सिंग यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या मेळाव्याला निलेश तेंडोलकर, जिल्हा सचिव अतुल पाटील, जिल्हा संघटक शीतल कदम यांच्यासह शिवसेना व संलग्न संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यानंतर वसई तालुक्यातील शिवसेना संघटनेला नव्या ऊर्जेची चालना मिळाल्याचे दिसून येत असून आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जोरदार हालचाली होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Post a Comment
0 Comments