अहिल्यानगर / प्रतिनिधी :- सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या खुल्या काव्य संमेलनासाठी (कवी कट्टा) नवोदित कवींकडून कविता मागविण्यात येत आहेत. “नवोदित कवींनी आपल्या दोन स्वरचित कविता कवी कट्टासाठी पाठवाव्यात,” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदच्या राज्य कार्यकारिणी सदस्य कवयित्री शर्मिला गोसावी व सहसचिव स्वाती ठुबे यांनी केले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच अहिल्यानगर येथील जाधव लॉन्स येथे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कवी कट्टा उपक्रमासाठी कविता मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाधिक नवोदित कवी-लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गेल्या वीस वर्षांत झालेल्या सोळा साहित्य संमेलनांमधून शब्दगंधच्या विचारपिठावर नवोदित म्हणून कविता सादर करणाऱ्या अनेक कवींनी आज विविध व्यासपीठांवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे नवोदितांसाठी शब्दगंधचे संमेलन ही एक साहित्यिक पर्वणी ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
येत्या 23 मे रोजी होणाऱ्या कवी कट्टासाठी इच्छुकांनी आपल्या दोन स्वरचित कविता, संक्षिप्त परिचय, छायाचित्र तसेच पोस्टाची पाच रुपयांची पाच तिकिटे शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर - 414003 येथे पाठवावे असे आवाहन उपाध्यक्ष जयश्री झरेकर, पाथर्डीच्या प्रा. आशा पालवे, प्रा. डॉं. जयश्री खेडेकर, सुरेखा घोलप, सरला सातपुते, राहुरीच्या शर्मिला रणधीर, जयश्री मंडलिक, कोपरगाव शाखेचे अध्यक्ष ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, स्वाती मुळे, ॲंड. श्रद्धा जवाद, शेवगावच्या विद्या भडके, मीरा आरले, नेवासा शाखेच्या डॉं. निर्मला सांगळे आणि श्रीरामपूर शाखेच्या संगीता फसाटे यांनी केले आहे. नवोदित कवींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments