* चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू : पाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर अचानक झडप
गुंजेवाही - चंद्रपूर / संजय बागडे :- गुंजेवाही परिसर आज एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेने हादरून गेला आहे. जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला नेहमीप्रमाणे जंगल परिसरात पाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. दैनंदिन काम सुरू असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हल्ला इतका वेगवान आणि भीषण होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. वनविभाग आणि पोलीस प्रशासनालाही तातडीने पाचारण करण्यात आले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, जंगलालगतच्या गावांमध्ये वाढत्या वाघांच्या हालचाली रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवून पिंजरे लावावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा सुरू असून मृत महिलांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गुंजेवाही परिसरात भीती आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.


Social Plugin